संगमनेर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे संपूर्ण राज्यात पाच वर्षासाठी राबविले जाणार आहे, या अभियानामध्ये जी ग्राम पंचायत सर्वोत्कृष्ट काम करेल त्या ग्रामपंचायतीचा राज्य, विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर गौरव होणार आहे, त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेऊन चांगले काम करून बक्षीस मिळवावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.



महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ ,गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषी अधिकारी वाळीबा उघडे, बालविकास प्रकल्पाधिकारी निलेश राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कुंडलिक येवले, आर पी आय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यामागचा उद्देश संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आपल्या प्रस्ताविकातून मांडला. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव व नंदकुमार राहणे यांनी केले तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी मानले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



