संगमनेर ब्रँड राज्यपातळीवर बदनाम करण्याचा त्यांचा डाव – माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे

  • नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आरोप – दुर्गाताई तांबे
  • चौकशीचे स्वागत, चौकशीतून दूध का दूध, पानी का पानी होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे तोंडघाशी पडतील.

निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. या योजनेला 2009 मध्ये नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन व जीवन प्राधिकरणसह सर्व विभागांच्या मंजुरी मिळाली आहे. 2009 च्या योजनेबाबत 2026 मध्ये अत्यंत खोटे व चुकीचे आरोप करून नवीन लोकप्रतिनिधी हे संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करत आहे. या योजनेच्या चौकशीचे आम्ही स्वागत करत असून दूध का दूध और पानी का पानी होऊन खोटे आरोप करणारे तोंडघाशी पडतील, खरे तर नगरपालिका निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन आरोप करत असल्याची  टीका माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.

संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेसारख्या पवित्र सभागृहामध्ये संगमनेरची बदनामी केल्याप्रकरणी सौ दुर्गाताई तांबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहर हे विकसित व शांततेचे शहर आहे. या शहरातील वाढती लोकसंख्या गृहीत धरून निळवंडे धरणातून ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना राबविण्यात आली. आणि ही योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे शहरातील सर्व जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी दररोज मिळत आहे.

5 मे 2009 रोजी प्रधान सचिव व सर्व विभागांची महाराष्ट्रातील यूआयडीएसएसएमटी योजने संदर्भात बैठक झाली यावेळी लोकसभा व विधानसभेच्या आचारसंहिता लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया व कामे पूर्ण करण्यासाठी  उपाययोजना करणे बाबत व कार्यादेश 31 जुलै 2009 पूर्वी करण्याचे स्पष्ट आदेश दिले. या आदेशानुसारच तत्कालीन मुख्याधिकारी यांनी या योजनेचे प्रकल्प सल्लागार यांची सर्व संबंधित विभागांच्या जीवन प्राधिकरणाच्या आवश्यक मंजुरी घेऊनच कार्यादेश देण्याबाबत प्रशासकीय बाबी पूर्ण केलेल्या आहेत. योजनेचे सर्व काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झालेली असून त्यामुळे शहरातील सर्व प्रभागांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत आहे या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करूनच बिल अदा करण्यात आलेले आहे. याप्रमाणे सर्व विभागांच्या मंजुरी असल्याने कोणतेही चुकीचे काम झालेले नसून फक्त दिशाभूल करण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधी हे आरोप करीत आहेत

 प्रधान सचिव  नगर विकास व सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी लोकसभा व विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या योजनेला तातडीने कार्यारंभ करावा अशा सूचना नगर विकास विभागाकडून देण्यात आल्या. सदर टेंडर मधील वाढीव रकमेबाबत एमजीपी व शासनाच्या विभागाकडून दुरुस्ती करून घ्यावी. अशा सूचना देण्यात आल्या. यानंतर ही दुरुस्ती करून घेऊन शासनाचे सर्व विभाग जिल्हाधिकारी व एमजीपीचे प्रमुख यांच्या वतीने ही मंजुरी देण्यात आली. या व्यतिरिक्त या पूर्ण योजनेचे बिल देताना थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले असून त्यानंतर बिल दिले आहे. यामध्ये शासनाच्या सर्व विभागांच्या पूर्ण मंजुरी आहेत कुठेही चुकीचे काही झाले नाही .

मात्र संगमनेर शहर व तालुका यांची प्रगती ही संगमनेर ब्रँड म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. याचे श्रेय त्यांना कधीही मिळत नाही. याला बदनाम करण्यासाठी विधानसभेसारख्या पवित्र सभागृहांमध्ये नवीन लोकप्रतिनिधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि अपूर्ण माहितीच्या आधारे मांडणी करून जनतेची दिशाभूल करत आहे.

आतापर्यंत शहर व तालुक्यासाठी एक रुपयाही निधी न आणता फक्त बदनामी करण्याचे काम त्यांनी केले आहे. या योजनेबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले .  या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. यामुळे खोटे आरोप करणारे आणि तोंडाच्या वाफा दवडणारे लोक तोंडावर पडतील हे नक्कीच असल्याचे त्या म्हणाल्या.

नगरपालिकेतील सपाटून झालेल्या पराभवामुळे वैफल्यग्रस्ततेमधून आरोप
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवीन लोकप्रतिनिधी यांची नगराध्यक्ष पदाची घरातील उमेदवार यांनी सपाटून मार खाल्ला. याचबरोबर त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. मूलभूत प्रश्न सोडून वेगळ्याच विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा हा उद्योग असून संगमनेर तालुक्यातील व शहरांमधील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे व्यक्तिगत आकासापोटी ते खोटे व तथ्यहीन आरोप इतक्या मोठ्या सभागृहात करत आहेत. कदाचित शहरांमधून एक वर्षापासून टक्केवारी बंद झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन ते आरोप असावेत अशी टीका संगमनेरचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

प्रशासकीय बाबींना प्रशासक जबाबदार असतो
नगर परिषदेचे कामकाज करताना प्रशासकीय बाबींची जबाबदारी ही प्रशासनाची म्हणजे मुख्याधिकाऱ्यांची असते. यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, किंवा नगरसेवकांचा यांचा कोणताही संबंध नसतो. यामुळे प्रशासकीय बाबींबाबत प्रशासकीय अधिकारी उत्तर देतील. यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे नाव घेऊन संगमनेरला बदनाम करणाऱ्या या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.
विश्वासराव मुर्तडक, माजी नगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *