दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात निर्माण झालेल्या भावनिक आणि राजकीय पोकळीला अखेर उत्तर मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या तीव्र आणि एकमुखी मागणीला मान देत भारतीय जनता पक्षाने (भाजप) 2026 च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिलेल्याप्रसिद्धीपत्रकानुसार, राहुरी (223) मतदारसंघातून अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आली आहे. ही घोषणा होताच राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून वारसाला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त होत आहे.

कार्यकर्त्यांची मागणी अखेर मान्य !
शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत होती. गावोगावी बैठका, संवाद यात्रा आणि जनसंपर्कातून ही मागणी अधिक तीव्र झाली होती. अखेर पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत हा निर्णय घेतला.
शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा…
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघात विकासकामांची मोठी परंपरा निर्माण केली होती. त्यांच्या साध्या, जनतेशी जोडलेल्या स्वभावामुळे ते सर्वसामान्यांचे नेते बनले होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी आता अक्षय कर्डिले यांच्यावर येणार आहे. तसेच दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पाहिलेले स्वप्न आता अक्षय कर्डिलेस पूर्ण करतील असा जनतेचा ठाम विश्वास आहे.


विकासाचा ध्यास घेऊन अक्षय कर्डिले अक्षय कर्डिले उतरणार निवडणुकीच्या रिंगणात…
अक्षय कर्डिले हे गेल्या काही काळापासून शिव निर्धार यात्रा आणि विविध जनसंवादातून सक्रिय झाले होते. युवा नेतृत्व, स्थानिक प्रश्नांची जाण आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.
राजकीय समीकरणे बदलणार !
अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीमुळे राहुरी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. भाजपने भावनिक आणि संघटनात्मक दोन्ही पातळ्यांवर मजबूत डाव खेळला असल्याचे बोलले जात आहे. आता लक्ष लागले आहे ते येणाऱ्या निवडणुकीकडे… कार्यकर्त्यांची ताकद आणि वारशाची लाट अक्षय कर्डिले यांना विजयी करणार असा सर्वसामान्यांचा निर्धार बघायला मिळतोय.



