- तळेवाडी आणि सारोळे पठार येथील सप्ताहला आ. खताळ यांची भेट
संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. संघर्षातूनच मी पुढे आलो आहे आणि यापुढेही जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष कायम राहणार आहे. हा भाग अकोले मतदारसंघात असला तरी अकोले-संगमनेर असा भेदभाव मनातून काढून टाका. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील पोखरी बाळेश्वर गावा अंतर्गत असलेल्या तळेवाडी गावाला तसेच सारोळे पठार येथील अखंड हरिनाम सप्ताह आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली.या प्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी भाजप अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, भाजप युवा मोर्चाचे शैलेश फटांगरे, सुधीर पोखरक,र प्रशांत फटांगरे, तळेवाडीचे भाऊसाहेब काळे, किसन घोगरे, अजित काळे, गणेश गफले, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते . यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक समस्यांचा आढावा घेतला आणि विविध विकास कामांबाबत आश्वासन दिले.
आमदार खताळ म्हणाले की, या भागातील वन जमिनींचा प्रश्न हा दीर्घकालीन असून यासाठी आपण सातत्याने पाठपुराव करत आहोत. आपल्याकडे कोणती ही संस्था नसली तरी उपलब्ध साधन सामग्री च्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, गावातील मंदिरासाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी साथ दिल्याचा उल्लेख करत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच विकासकामांना गती देणे शक्य झाले आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या काळा मध्ये जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून सारोळे पठार फाटा ते गाव या रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचे काम लवकरात सुरू होणार या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील पोखरी गावांतर्गत असणाऱ्या तळेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलजीवन मिशनचे काम बंद असल्याची तक्रार गावातील भाऊसाहेब काळे यांनी आ. खताळ यांच्याकडे केली त्यानंतर आ खताळ यांनी जलजीवन मिशन योजनेतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जलजीवन विभागाचे अधिकारी पुढील आठ दिवसांमध्ये तळेवाडीत भेट देतील असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

आमदार खताळ यांची मदत ठरली दिलासादायक
संगमनेर तालुक्याच्या पठारा भागा तील पोखरी बाळेश्वर गावांतर्गत येत असणाऱ्या तळेवाडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र यावर्षी परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आ.अमोल खताळ यांनी पुढाकार घेत दोन दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. या मदतीमुळे सप्ताहासाठी आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला. पाण्याअभावी होणारी गैरसोय टळल्याने ग्रामस्थ व आयोजकांनी आमदार खताळ यांचे मनापासून आभार मानत धन्यवाद दिले आहेत.



