- आमदार सत्यजीत तांबेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
- पारेगाव सौर प्रकल्पाला गती
संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे प्रस्तावित ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध वादांमुळे रखडला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

नक्की विषय काय?
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि कंपनीमध्ये मतभेद निर्माण होऊन प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
या सगळ्या विषयाची माहिती घेऊन १८ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत “गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल,” अशी ग्वाही दिली होती.




मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पुढाकाराने संगमनेर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. परिणामी आज या प्रकल्पाच्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत उभारला जाणारा हा प्रकल्प पारेगावसह परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
गावकऱ्यांनी मानले विशेष आभार
या संपूर्ण प्रकरणात आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरला तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी सत्यजित तांबे यांचे विशेष आभार मानले.



