प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी म्हटले आहे की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात देणेदारी झाली. यासाठी त्यांनी ३२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम इतरांची देणेदारी मिटविण्यासाठी मी देवू केली. सदर रक्कम एक महिना टप्प्या-टप्प्याने परत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.
मात्र या रकमेसाठी प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र माझे पैसे देण्याएैवजी त्यांनी यासर्व आर्थिक व्यवहारांना राजकारणाशी जोडून माझी व्यक्तीगत बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविक यासर्व व्यवहारात आमदार अमोल खताळ यांचा कुठेही संबंध आलेला नाही. तरीही जाणिवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचे काम प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येवून सुरु केले आहे.

