महाराष्ट्रधर्म हा माणुसकीची शिकवण देणारा – डॉ. जयश्रीताई थोरात

देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर समाज सुधारक संत यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र असून समतेची व मानवतेची शिकवण देणारा महाराष्ट्र धर्म हा देशाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.वडगाव पान येथे अखंड हरिनाम सप्ताहात थोर कीर्तनकार हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या उपस्थितीत झालेल्या हरिकीर्तन प्रसंगी भाविकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा मानवता धर्म सांगणारा आहे. महाराष्ट्र धर्मामध्ये अठरापगड जाती सर्व धर्म यांचा समावेश होतो. राकट आणि कणखर असलेल्या महाराष्ट्र हा सांस्कृतिक समृद्धता लाभलेला प्रदेश आहे.

संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव जनाबाई यांची परंपरा घेऊन वारकरी संप्रदायाने समतेचा आणि मानवतेचा विचार दिला. आषाढी वारीमध्ये लाखो भाविक एकत्र येतात लहान मोठा भेद विसरून माऊली होऊन एकत्र चालतात. महिला भगिनी ह्या घरात सर्वांसाठी काम करतात मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः करता वेळ द्या असे आवाहन त्यांनी केले.

तर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक म्हणाले की, थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या कामातून महाराष्ट्रात संगमनेरचा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा लौकिक निर्माण केला जनतेची सेवा हीच खरी परमेश्वर सेवा असल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात हे जनतेच्या हृदयात जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाला मदत ते खरे वारकरी असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून सुश्राव्य कीर्तन झाले या कीर्तनासाठी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *