उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राचा उमदा नेता गेल्याने राज्यावर मोठा आघात झाला असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. संगमनेर शहर व तालुक्यातही अत्यंत शोकाकुल वातावरण असून अजित दादा पवार यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे अचानक थोरात सहकारी साखर कारखान्याला दिलेली भेट ही संगमनेरची शेवटची भेट ठरली आहे.

27 एप्रिल 2017 रोजी अजित पवार यांनी अचानक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या नवीन 5500 मे टन क्षमतेच्या कारखान्याला भेट दिली. कारखान्याच्या कामकाजाची पूर्ण माहिती घेतली. याचबरोबर कारखान्याचे प्रशासन, कारभार, गुणवत्ता याबद्दल अत्यंत कौतुक सुद्धा केले. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक होता. कामाचा माणूस म्हणून त्यांची सर्वत्र लोकप्रियता होती. अशाच आपल्या रोखठोक स्वभावानुसार त्यांनी दुपारी अचानकपणे कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. अजित दादा कारखान्यावर आले हे पाहून कारखाना व्यवस्था आपल्याला आश्चर्य वाटले. परंतु दादांनी तात्काळ सांगितले की बाळासाहेब मुंबईत आहे त्यांना काही सांगू नका. मी मस्त चहा पितो गप्पा मारतो.



आणि अजित दादांनी कारखान्याचा फेरफटका मारला याचबरोबर नवीन पद्धतीने उभारलेल्या 5500 मीटर क्षमतेचा कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सिताराम गायकर,कपिल पवार आदींसह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
साखर कारखानदारी हा ग्रामीण विकासाचा आत्मा आहे असे त्यांनी त्यावेळेस म्हटले. याचबरोबर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याबरोबर सर्व सहकारी संस्थांनी अत्यंत चांगले काम केले असून संगमनेरचा सहकार हा मॉडेल ठरला आहे. कारखान्याचा हा नवीन आधुनिक प्रकल्पाचा पॅटर्न बारामती सह इतर ठिकाणी राबवला गेला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. याचबरोबर पूर्णवेळ पाहणी केल्यानंतर त्यांचा कारखान्याच्या विश्रामगृहावर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अजित दादा म्हणाले की, गड्या हो, राजहंसचा चहा एकदमच भारी राव, चांगलं काम करा हा अजित दादा तुमच्या कायम पाठीशी आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व अजित दादा पवार यांनी मंत्रिमंडळात अनेक वर्षे एकत्र काम केले. याचबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रमुख जबाबदारी सांभाळताना कोरोना संकटामध्ये महाराष्ट्र सावरला. रुबाबदार व्यक्तिमत्व, स्पष्ट बोलण्याची पद्धत, विविध विषयांचा अभ्यास, ग्रामीण विषयांची नाळ असे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्व अचानक हरपल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर मोठा आघात झाला हा धक्का संगमनेरकरांना सुद्धा बसला आहे. कारखान्याला दिलेली भेट ही संगमनेर करांसाठी शेवटची ठरली.

अमृत उद्योग समूह समूहाकडून श्रद्धांजली
महाराष्ट्राचे लोकप्रिय दादा म्हणून ओळख असलेले अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे रुबाबदार फोटो फ्लेक्स वर पाहून प्रत्येकाचे मन भरून येत आहे. अमृत उद्योग समूहाने सुद्धा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून सर्व संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वारावर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.



