- आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेतात
दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. कारखान्याने या कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केला तसेच आपण जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी निधी मिळवला. चारीचे काम पूर्ण झालेले होते.चारी आम्हीच केलेली आहे. सुदैवाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पाणी आले त्यात तुमचे योगदान काय. आयत्या पिठावर रेघोट्या ओढता. काम न करता खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता असा थेट सवाल मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना केला आहे.

यावेळी भोजापुर चारीच्या कामाबाबत बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी केली गेली. त्यावेळी संगमनेर व प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून ही चारी करायची होती. पूर्वेच्या लोकांनी याकडे पाहिले सुद्धा नाही. आपल्या कारखान्याने ८० लाख रुपये खर्च केला. चारी तयार झाली आपण जलसंधारणमंत्री झाल्यानंतर वेळोवेळी निधी मिळवला. चारी तिगाव माथ्यापर्यंत नेली. महाविकास आघाडी काळामध्ये शंकराव गडाख जलसंधारण मंत्री असताना पुन्हा 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मिळवला. चारी पूर्ण तयार केली. पावसाळ्यामध्ये दरवर्षी चारीची देखभाल दुरुस्ती कारखान्याने केली.
ही चारी काही आठ महिन्यांमध्ये झाली नाही. यासाठी काम करावे लागले. तुमच्याकडेही 35 वर्षे खासदारकी होती.तुमच्याकडून या चारीचा एक खडा तरी उचलला गेला का असा सवाल करताना खोट्या नाट्या गोष्टीं सांगून क्रेडिट घेऊ नका असे सुनावले तर सुदैवाने यावर्षी मे महिन्यातच पाऊस चांगला झाला.पाणी लवकर आले याचा सर्वाधिक आम्हाला आनंद आहे.
भोजापुर चारी आम्ही केली असे सांगताना निळवंडे कालव्यावरून नान्नज दुमाला व वरील गावांसाठी तीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. त्या कुणी रद्द केल्या असा सवाल त्यांनी विचारला. याचबरोबर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. या रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिली. यातील 40 कोटींचा निधी हा दुसऱ्या तालुक्यात नेला गेला हे कसे काय झाले.
अनेक दिवसांच्या परिश्रमातून हा तालुका उभा केला आहे. सुसंस्कृत राजकारणाची पद्धती आपली आहे. विरोधकांनाही संस्था उभ्या करण्यात आपण मदत केली आहे. कधीही कुणाची अडवणूक केली नाही. कुणाच्या वाट्यात काट्या टाकल्या नाही. निवडणूक संपली राजकारण संपले ही आपली परंपरा राहिली. मात्र आता मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यात खोट्यानाट्या केसेस टाकल्या जात आहेत. 353, 307 सारखे भयानक गुन्हे नोंदवले जात आहेत. आज छळ करून कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. तालुक्याची विकासाची घडी त्यांना विसकोटायची असून नवीन लोकप्रतिनिधी हत्यार होऊन तालुक्याचे नुकसान करू नये असे सांगताना चाळीस वर्षाच्या कष्टातून हा तालुका उभा केला आहे.
आज संगमनेर तालुक्याचा लौकिक राज्यभर आहे. येथील शिक्षण, सहकार, समृद्ध बाजारपेठ, वैभवशाली विकास, सुरक्षितता, शांतता आणि समृद्धता राज्याला आदर्शवत आहे .याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. एका दिवसात हे झालेले नाही. त्यासाठी कष्ट करावे लागले संघर्ष करावा लागला काम करावे लागले. सोशल मीडियावर खोट्या नाट्या पोस्ट टाकल्या जात आहे. खोटे व्हिडिओ टाकले जात आहे. चांगला विचार करा. केलेले कामे इतिहास व संघर्ष विसरु नका. कुणाच्या तरी सांगण्यावरून तालुक्याच्या विरोधी हत्यार होऊ नका असे आवाहन करताना हा विकासाचा लौकिक आपल्याला टिकवायचा असून अशांतता निर्माण करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे आवाहन ही त्यांनी केले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला.निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. आज तालुका समृद्ध आहे तो लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे असे ते म्हणाले.
नान्नज दुमाला व परिसरासाठीच्या 3 पाणीपुरवठा योजना का रद्द केल्या
तालुक्यातील प्रत्येक गावाला व शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आपण सातत्याने काम केले. पुढील काळातही निळवंडे कालव्याचे पाणी सर्व शेतकऱ्यांना शेततळ्यामधून वर्षातून तीनदा तरी देता येईल अशी नियोजन आपण केले होते. नान्नज दुमाला निमोन या परिसराला पाणी देण्याकरता तीन उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र सरकार बदलले आणि त्यांनी या योजना रद्द केल्या. या योजना का रद्द केल्या असा सवाल विचारताना तालुक्यात आता सत्ताधाऱ्याकडून सुरू झालेले सुडाचे राजकारण अत्यंत दुर्दैवी असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे आहे.



