संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी विविध समस्या आमदार अमोल खताल यांच्या समोर मांडल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक तक्रारीवर आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर फोन लावत उपाययोजना करून अनेक समस्या सोडविल्यामुळे आलेला प्रत्येक नागरिक माघारी जाताना समाधानी दिसत होता.



मुंबईतील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर संगमनेरमध्ये परतल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य दिलं.
प्रत्येक व्यक्तीस पुरेसा वेळ देत आमदार अमोल खताळ यांनी प्रत्येक अर्ज समजून घेत त्यावर उपाययोजना केल्या तर काही प्रकरणांमध्ये जागेवरच निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली गेली. जनतेच्या प्रश्नांवर तत्पर प्रतिसाद देणाऱ्या आमदार खताळ यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे समाधान झाल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले.
- सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी समर्पित दिवस
“भाऊ, आमचा प्रश्न आहे…” असं म्हणत एकामागून एक नागरिक आपल्या समस्या मांडत होते. त्यावर तितक्याच तत्परतेने आमदार खताळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून कारवाई करत होते. सहा तासांच्या सलग उपस्थितीत आमदारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारले व अनेक प्रश्न निकाली काढले.



