श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघातील सारोळा , चिंचोळी पाटील, आठवड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीपात्रातील पाण्याची पातळी धोक्याच्या रेषेपलीकडे गेली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाधित शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाचपुते यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना धीर देताना शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे आमदार पाचपुते यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार दळवी, काकडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आमदार पाचपुते यांचे तात्काळ लक्ष व तत्पर नेतृत्व हे या संकटसमयी स्थानिक शेतकरी व नागरिकांसाठी निश्चितच आश्वासक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी – गणेश कविटकर



